संगमेश्वरमधील दोन गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्र झळ

संगमेश्वर : तापमानवाढीमुळे संगमेश्वर तालुक्यातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, पाचांबे गावातील जखीन टेप, नेरदवाडी, मेढे, कुंभारखाणी बुद्रुक गावांतील मधली वाडी चार वाड्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.
तालुक्यातील पाचांबे गावातील जखीन टेप, नेरदवाडी, मेढे, कुंभारखाणी बुद्रुक गावांतील मधली वाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे नदी, नाले, विहीर, बोअरवेल यांची पाण्याची पातळी झपाट्याने घटत चालली आहे. पाचांबे व कुंभारखाणी गावाला ही झळ अधिक तीव्र आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली जाणार असून, आवश्यकता वाटल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.



