पटवर्धन हायस्कूल व नाटेकर, गांधी, कीर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित, पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला कै. सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मकरंद पटवर्धन, भारत शिक्षण मंडळाचे सदस्य प्रवीण आंबेकर, विश्वस्त विनायक हातखंबकर उपस्थित होते.

पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा जोशी, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मांजरेकर, श्रीमती शुभांगी शिंदे, श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, श्रीमती निष्ठा कनगुटकर, श्रीमती शलाका वर्तक, श्रीमती शीतल रोकडे, श्रीमती मानसी चव्हाण, श्रीमती मालन तांबोळी, श्रीमती शबनम तहसीलदार, तानाजी वाघमारे, श्रीमती योगिनी भागवत, श्रीपाद गुरव, श्रीमती वृंदाली गुरव, श्रीमती दीपिका कुलकर्णी आधी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मांजरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या मनोगतातून पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला-गुणांना वाव देणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसाठी उत्तम खेळाचे मैदान आखण्याचा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे अतिथी मकरंद पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी विविध कला- क्रीडेमध्ये सातत्याने सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. विद्यार्थ्यांनी पूर्व नियोजन करून कोणत्याही कार्याची उत्तम सुरुवात करावी, असे सांगितले.

भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांसाठी कौतुक केले. पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी नेहमीच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळवतात. यातूनच भारत शिक्षण मंडळाचा नावलौकिक वाढलेला आहे, असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात धनेश रायकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासाठी नेहमी प्रयत्नशील असतो, त्याची मेहनत, चिकाटी यातूनच तो घडतो “असे ते म्हणाले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
मैदानी खेळाला सुरुवात करताना १००मीटर धावणे या धाव प्रकाराला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी क्रिकेट, डॉजबॉल, कबड्डी असे सांघिक खेळ तसेच वैयक्तिक धावणे, गोळा फेक, दोरी उड्या असे खेळ ठेवण्यात आले होते. रस्सीखेचचा रंगतदार सामना देखील यामध्ये समाविष्ट होता.
क्रीडाशिक्षक दत्तात्रय मांजरेकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मानसी चव्हाण यांनी केले.

