संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथील विश्रांती कक्षातून सव्वा लाखांचे दागिने चोरीला

संगमेश्वर : दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासाची संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये विश्रांतीगृहात ठेवलेली बॅग चोरीला गेली आहे. या बॅगेत १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने होते. ही दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची फिर्याद अन्विता अविनाश पवार हिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
अन्विता पवार (वय २८ वर्ष, रा. धामापूर ढोपरखोलवाडी सध्या राहणार दिवा) ही धामापूर वाडी येथे येण्यासाठी दिवा जिल्हा ठाणे येथून दिवा ते रत्नागिरी जाणारी पॅसेंजर रेल्वे गाडीने संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथे उतरून रेल्वे स्टेशन येथील विश्रांती कक्षात बसली होती. यावेळी त्या महिलेने विश्रांती कक्षात बसण्यासाठी असलेल्या बाकड्याखाली सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवली होती. या बॅगेत ७५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, ५ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज होता. ही बॅग अज्ञाताने लंपास केल्याची घटना २३ मार्च रोजी पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्याने घडली.
बसलेल्या बाकड्याखाली ठेवलेली दागिन्याची बॅग नाही हे लक्षात आल्यावर अन्विता पवार या महिलेने आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्याने तिने संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.



