रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ९ मे रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ९ मे रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणाअंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसूलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी या लोक अदालतचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
तसेच पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यासाठी आपले वकील, संबंधीत न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.



