
मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजे काय? मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजे शांत आणि स्थिर असणे, तसेच आतून भावनिकदृष्ट्या कोमल असणे. जेव्हा तुम्हाला आतून कोमलता जाणवते, जेव्हा मन सहज राहते किंवा आपले मत बनवत नाही, तेव्हा ते निरोगी अवस्थेत असते. मानसिक आरोग्य म्हणजे अंतर्मनातून बाह्यजगाकडे आणि बाह्यजगातून अंतर्मनाकडे होणारा प्रवाह.
जीवनाची चार वैशिष्ट्ये आहेत ते अस्तित्वात येते, विकसित होते, अभिव्यक्त होते आणि समाप्त होते आणि जीवन अस्तित्वात राहण्यासाठी, विकसित होण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी आणि समाप्त होण्यासाठी पाच तत्वांवर अवलंबून असते ते म्हणजे पृथ्वी, पाणी, वायू, आकाश आणि अग्नी. संपूर्ण विश्व, ज्यामध्ये शरीर आणि मन यांचाही समावेश आहे, याच तत्वांनी बनलेले आहे. प्रत्येक तत्व एका कार्याशी संबंधित आहे पृथ्वीशी गंध, पाण्याशी चव, वायूशी स्पर्श, आकाशाशी ध्वनी आणि अग्नीशी रूप. ही सर्व पाच तत्वे आपल्या आत सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात आहेत.
आपले मन या पाच सूक्ष्म तत्वांनी बनलेले आहे. आणि प्रत्येक तत्व वेगवेगळ्या वेळी मनावर प्रभाव टाकते. हा एक नैसर्गिक नियम आहे. कोणतेही एक तत्व कायमचे प्रभावी राहत नाही. पाऊस पडतो. तो तुम्ही थांबवू शकत नाही. वारा वाहतो. तो तुम्ही थांबवू शकत नाही. सूर्य तळपतो. तो तुम्ही थांबवू शकत नाही. हे सर्व ‘घडत’ असते आणि यांचा मनावर सूक्ष्म प्रभाव असतो. त्याचप्रमाणे, ही पाच तत्वेही मनावर प्रभाव टाकतात आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भावना आणि अनुभूती निर्माण करतात. हे खूप रोचक आहे. हे खूप मौल्यवान ज्ञान आहे!
साधारणपणे, आपण आपल्या भावना आणि अनुभूती पाच मुख्य गटांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे जडपणा किंवा सुस्ती जाणवणे, जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. उष्णता किंवा जळजळ सारखी भावना अग्नी तत्वाशी संबंधित असते. जर एखाद्याला खूप राग, ताण किंवा जळजळ जाणवत असेल, तर अग्नी तत्व प्रभावी असते. हालचाल करणे किंवा कुठेतरी पळून जाण्याची इच्छा वायू तत्वामुळे होते. एकत्रितपणा, एकरूपता किंवा प्रवाहीपणा पाण्याच्या तत्वाशी संबंधित असतो. आकाश तत्व भीती, प्रेम, अस्वस्थता किंवा तृप्ती, समाधान यांना नियंत्रित करते.
आपण या सर्व तत्वांशी स्वतःला जोडून घेतल्याने त्यात वाहून जातो. कदाचित तुम्ही अनुभवले असेल की कधी कधी तुम्ही रागात काहीतरी बोलता आणि नंतर पश्चात्ताप होतो, कारण त्या क्षणी तुम्ही स्वतःला ‘राग’ या भावनेशी जोडलेले असता. खरे ज्ञान म्हणजे हे जाणणे की तुम्ही या पाच तत्वांपैकी कोणतेही नाही. आणि हेही समजणे की कोणतेही तत्व कायम राहत नाही. तुम्ही लक्ष दिल्यास, ती काही काळ टिकतात आणि नंतर नाहीशी होतात, ती बदलतात. पण जर तुम्ही याबाबत अज्ञानात राहिलात, तर एखादे तत्व दीर्घकाळ टिकून राहू शकते, कारण तुम्ही त्याला जाऊ देत नाही. यालाच बंधन म्हणतात.
प्रत्यक्षात मात्र काहीही तुम्हाला बांधून ठेवत नाही. तुम्ही फक्त त्या गोष्टीला बांधू शकता जी आधीच हालचाल करणारी आहे! यातील गंमत अशी की पाच तत्वे तुम्हाला बांधत नाहीत; तुम्हीच त्यांना बांधून ठेवता. हे अगदी त्या माशीप्रमाणे आहे जी खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हीच तिला अडवता. तुम्ही दरवाजा बंद करता. काहीतरी बाहेर पडू इच्छिते, पण तुम्ही ते होऊ देत नाही. तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्हाला हे जाणवते की तुम्ही फक्त साक्षीदार आहात, जे काही घडत आहे त्याचे निरीक्षक आहात, तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळते. तुम्ही शुद्ध चैतन्य आहात, कोणत्याही घटनेचा किंवा प्रसंगाचा स्पर्श न झालेले, कलुषित न झालेले, आकाशासारखे निर्मळ. जेव्हा ही जाणीव तुमच्यात दृढ होते, तेव्हा तुम्ही पूर्णपणे मुक्त होता आणि हे कधी शक्य आहे? अगदी आत्ताच.



