रत्नागिरी जिल्हा छायाचित्रकारांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडीओ व्यवसायिकांची सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील छायाचित्रकारांना शासनाच्या सीएमइजीपी योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा असून तत्काळ जिल्हा उद्योग केंद्राच्या पदाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात निर्देश दिले.
रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडीओ व्यवसायिकांच्या सहकारी संस्थेच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळावाला पालकमंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील छायाचित्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्याची विनंती केली. सोबत आजवर छायाचिकारांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल नाम. उदय सामंत व राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी तालुका युवासेना अधिकारी तुषार साळवी यांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे, परेश राजीवले, विनय बुटाला,अनिकेत दुर्गवली, सुबोध भुवड, हर्षल कुलकर्णी, अनुपम तिवारी, सुशील मांडवकर, समीर जुवेकर, अनिकेत जाधव, सुनील शेटे, निलेश कोळंबेकर, अक्षय उकिर्डे, प्रशांत निंबरे, कलीम मुल्ला, चारुदत्त नाखरे, शेखर जोगळे, दिनेश शिंदे, राजेश सासवडे, प्रदीप हरचिरकर, साईप्रसाद पिलणकर, अमित आंबवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी या व्यवसाय मेळाव्याला विविध बँकानी उपस्थित रहावे यासंर्भात जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. दरम्यान, या मेळाव्याचे ठिकाण स्थळ लवकरात लवकर जिल्ह्यातील फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर्स कळविण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.



