
गावखडी : बाप्पा मोरयाचा जयघोष… ढोलताशांचा निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशाच्या भक्तीने उत्साहित चेहरे अशा भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थीपूर्वीच हरतालिका तृतीयेला गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेणे पसंत केले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी आज (२६ ऑगस्ट) अगदी वाजत गाजत रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावात बाप्पाची मूर्ती घरी आणली.
गणरायाच्या पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य, खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठ फुलल्या आहेत. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीसाठी फुले, केवडयांची पाने, कमळ, दुर्वा, शमीपत्र, फुलपत्री यांना मागणी असे. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही खरेदी चालू असून मोठ्या प्रमाणावर उलाढाल बाजारात सुरू आहे.
गणरायाच्या आगमनाच्या लगबगीमुळे मंगळवारी बाजारपेठ तसेच मेर्वी सारख्या ग्रामीण भागात घरोघरी गणरायाची लगबग दिसून येत आहेत.



