ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी

रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी प्रकल्पाअंतर्गत ॲड. बाबासाहेब नानल गुरूकुलातील इयत्ता पाचवी व सातवी मधील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या पानवल येथील तरूण होतकरू शेतकरी चैतन्य मुळ्ये यांच्या शेतात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद घेतला. यावेळी शेतकरी श्री. मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना भातशेती मधील दाढ काढणे व लावणी करणे यांचे प्रात्यक्षिक दाखवले विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याप्रमाणे शेतामध्ये लावणी केली. यानंतर ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. शेतीसाठी लागणारी खते बी-बियाणे फवारणी यांची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.


श्री. मुळे यांच्या वडिलांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक विविध औषधी वनस्पती या संदर्भात माहिती दिली. तसेच कल्पवृक्ष म्हणजे नारळच्या माध्यमातून नवनवीन वस्तू निर्मिती केली जाते याची माहिती देताना झावळांच्या माध्यमातून दैनंदिन स्वच्छतेसाठी लागणारी केरसुणीच्या बांधणीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. लावणीनंतर योग्य ती खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांनी पानवल येथील नैसर्गिक वाहत येणाऱ्या पाण्यापासून निर्माण झालेल्या धबधब्यात भिजण्याचा आनंद घेतला.

गुरुकुलमधील अध्यापक गौरव पिलणकर, सागर रसाळ, सौ. गिरीजा करकरे यांनी लावणी व वर्षा सहलीचे उत्तम नियोजन करून गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी केला.



