
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ३० ऑक्टोबर रोजी मिरकरवाडा जेट्टीला भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला. मिरकरवाडा जेट्टी स्वच्छ, सुंदर ठेवण्याबाबतही त्यांनी यावेळी मच्छीमारांना आवाहन केले.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी मिरकरवाडा जेट्टीची पाहणी करून मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नुरउद्दीन पटेल, माजी नगरसेवक सोहेल साखरकर, उपाध्यक्ष साबीर होडेकर, मजहर मुकादम, यासीन मजगावकर यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी विंडी ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या अलर्टनुसार वेळच्यावेळी कार्यवाही करण्याचे तसेच आपण सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. कुणाचे काही नुकसान झाले आहे का, याबाबतही विचारणा करून माहिती घेतली. तसेच नौकेच्या केबीनमध्ये जात त्यांनी आतील वॉर्निंग यंत्रणेसह अन्य माहिती घेतली.

मिरकरवाडा जेट्टी येथील बंद असणारे हायमास्ट सुरू करण्याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने प्रस्ताव द्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, मच्छीमार संघटनेने आपली जेट्टी स्वच्छ, सुंदर ठेवावी. त्यासाठी कचऱ्याकुंड्यांचा जागोजागी वापर करावा. परदेशातील बंदरांप्रमाणे हे ‘मॉडेल डॉक’ म्हणून मिरकरवाडा तयार करावा. त्यासाठी निश्चितच प्रशासन आपल्याला सहकार्य करेल.
या भेटीवेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रातांधिकारी जीवन देसाई, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सागर कुसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते.



