काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील ४२ जण सुरक्षित
जिल्हा प्रशासन संपर्कात : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ४२ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात, असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
रत्नागिरीमधील साक्षी संदीप पावसकर (वय २६) आणि रुचा प्रमोद खेडेकर (वय २१) या सिंधुदुर्गातील ६ नातेवाईकांसोबत २० एप्रिल रोजी काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्या २३ एप्रिल रोजी रात्री मुंबई येथे पोहोचतील. शिरगाव (रत्नागिरी) येथील खलिफ मुकादम व कुटुंब एकूण ६ सदस्य हे २० एप्रिल रोजी अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटलमध्ये सुखरूप असून, २५ एप्रिल रोजी फ्लाईटने परतीचा प्रवास करणार आहेत. रत्नागिरी येथील मनोज जठार, अनुश्री जठार व इतर ३२ असे एकूण ३४ सदस्य २१ एप्रिल रोजी श्री टुरिझम मार्फत रत्नागिरीमधून काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक कटार, जम्मू येथे सुखरूप आहेत. आज (२४ एप्रिल)“ रोजी रेल्वेने दिल्लीत येणार असून, सर्व पर्यटक २६ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे पोहोचणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांना संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत.



