‘एनएसएस’मधून सशक्त संस्कारीत नागरिक घडतात : उपप्राचार्य सुनील गोसावी

रत्नागिरी : ‘एनएसएस’मधून सशक्त संस्कारीत नागरिक घडतात, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले.
२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत या विशेष निवासी शिबिराचे आयोजन कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. गोसावी तसेच पर्यवेक्षक विद्याधर केळकर ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीच्या ग्रामसेविका सौ. अमृता गोरीवले, शिक्षण सुधारक समिती कुर्धेचे कार्याध्यक्ष वसंत फडके, राधा पुरुषोत्तम पटवर्धन हायस्कूल कुर्धेचे मुख्याध्यापक विजयानंद निवेंडकर, माजी सरपंच शशिकांत म्हाहदे, पोलीस पाटील जयंत फडके, प्रा. सचिन सनगरे, विनायक गावडे, माजी कार्यक्रमाधिकारी मकरंद दामले, निनाद तेंडुलकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजीत भिडे सहकार्यक्रमाधिकारी प्रा. रिद्धी हजारे, प्रा. सुनील भोईर, प्रा. भूषण केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने व दीपप्रज्वलाने झाली. प्रा. अभिजीत भिडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून दिला व सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी शिबिरातील सत्रांचा आढावा घेतला.
अध्यक्ष भाषणात श्री. गोसावी यांनी शिबिरातून चांगले नागरिक घडविण्याची यशस्वी परंपरा एनएसएसमध्ये आहे, असे सांगितले. आनंददायी शिबिरातून भविष्यासाठी चांगले सोबती मिळतात व एनएसएस कुटुंब तयार होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शिबिराला शुभेच्छा दिल्या.
निवासी शिबिर अंतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, भात कापणीचा अनुभव, गणेशगुळे समुद्र परिसर व शाळा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ चर्चासत्रे, स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिद्धी हजारे यांनी केले व आभार प्रा.सुनील भोईर यांनी मानले. या शिबिराचे नियोजन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले.



