मुख्य बातमी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ३० जूनपर्यंत धान्य रेशन दुकानातून घेवून जावे

रत्नागिरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२५ पर्यंत जून ते ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्याच्या आपल्या हक्काच्या अन्नधान्याची उचल रास्त धान्य दुकानांमधून त्वरित करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना ३० जून पर्यंत रास्त भाव दुकानांमधून वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३१ टक्के धान्य गोदामापर्यंत उचलण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे एकत्रित धान्य रास्त धान्य दुकानातून घेवून जावे.

९ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार पावसाळ्यामुळे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या निर्देशानुसार सर्व तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक, गोदाम पालक, रास्त धान्य दुकानदार यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मे. क्रिएटीव्ह ग्रेन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी, हमाल कामगार संघटनेचे प्रतिनिधी, हमाल ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी, हमाल मुकादम या सर्वासोबत १२ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी बैठक घेवून सर्वाना शिस्तबध्दरित्या काम करून मुदतीत उचल पूर्ण करावी. जेणेकरून एकही लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये अशा सूचना दिल्या. बैठकीत रास्त धान्य दुकान संघटनेचे अशोक कदम यांनी रास्त धान्य दुकानदारांच्या अडचणी मांडल्या व त्याबाबत चर्चा केली.

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. हे धान्य जिल्ह्यातील ९५२ रास्त धान्य दुकानांपर्यंत पोच करण्यात येत आहे. ही मुदत ३१ मेपर्यंत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला असला तरी उचल मुदतीत पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. काही कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!