आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सोडत लागलेल्या मुलांची निवड व प्रतिक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर

रत्नागिरी : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) लागलेल्या मुलांची निवड यादी व प्रतिक्षा यादी राज्यस्तरावरून आर.टी.ई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. बालकांना प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत तालुका पंचायत शिक्षण विभागातील आरटीई २५ टक्के अर्ज पडताळणी समितीकडे जाऊन मूळ कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा. तसेच २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबविली जात असून प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. सबब २५ प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही दलाल/संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलिमा नाईक यांनी केले आहे.
बालकाचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये दरवर्षी प्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) लागलेल्या मुलांची निवड यादी व प्रतिक्षा यादी राज्यस्तरावरून आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून पालकांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस जाण्यास सुरूवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पाहावी. निवड झाली असल्यास तेथेच प्रवेश पत्र (अँडमिट कार्ड) प्राप्त करून घ्यावे.
प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किवा निवेदनाची दखल घेतली नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
आरटीई २५ टक्के प्रवेश हे राज्यस्तरावरील संगणकीय प्रणालीतून लॉटरी द्वारे होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची निवड का झाली नाही हे निश्चित सांगता येत नाही. यासाठी पालकांनी आग्रह धरू नये.



