जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची अयोध्या यात्रा सुखरूप आणि सुरक्षित
यात्रेकरूंनी मानले आभार

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यामुळे आमची अयोध्या यात्रा अत्यंत सुरक्षित आणि सुखरुप झाली. समाज कल्याण विभागाने अत्यंत चांगली सोय केल्याचे सांगून, गुरुवारी रत्नागिरीत परतलेल्या यात्रेकरूंनी पालकमंत्र्यांसहप्रशासनाचे आभार मानले.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, २६ एप्रिल रोजी कोकणातील पहिली रेल्वे अयोध्येकडे गेली होती. प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेवून, ही रेल्वे ज्येष्ठ यात्रेकरूंना सुखरूपपणे घेवून गुरुवारी रत्नागिरीत परतली. समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल विनोद देसाई, रवींद्र कुमठेकर आदींनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.

आपल्या घरातील मंडळी अयोध्येला जात असल्याने, त्यांना चांगली वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगून, सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा अयोध्येला पाठवताना दिल्या होत्या. गुरुवारी परतलेल्या यात्रेकरूंनी पालकमंत्री, समाज कल्याण विभाग, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे केलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. यात्रा सुखरूप आणि सुरक्षित झाल्याचे ते आनंदाने सांगत होते.
त्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे
सुनील ठाकूर (रा. कारवांची वाडी) : राज्य शासनाकडून, विभागाच्या आधिकाऱ्यांकडून राहण्याची, जेवणाची, प्रवासाची अत्यंत चांगली सोय केली होती. त्याबद्दल त्यांचे आभार.
कस्तुरबाई गोंधळी (रा. पाली) : आमदारांमुळे चांगला प्रवास झाला. काहीच त्रास झाला नाही. जेवणाची, राहण्याची सोय उत्तम होती. मंदिर परिसर फिरून दाखवले, दर्शन चांगले झाले. आम्हाला व्यवस्थित नेवून, व्यवस्थित आणले.

उल्हास खडपे (रा.राजापूर) : एकाही ज्येष्ठाला त्रास होणार नाही, शासनाचे माझे अधिकारी-कर्मचारी काळजी घेतील, आसे पालकमंत्री सामंतसाहेबांनी सांगितले होते. त्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे अत्यंत सुखरूपपणे आमची सोय केली. जेवणा-खाण्याची चांगली सोय झाली. ज्या, ज्यावेळी आवश्यकता भासायची त्या, त्यावेळी कर्मचारी हजर असत. शासनाचे मनःपूर्वक आभार..
प्रेरणा चव्हाण (प्रशिक्षणार्थी) : या तीर्थ दर्शन प्रवासात घरातल्याच आजी-आजोबांबरोबर अनुभव मिळाला. खूप आनंद झाला. हा आयुष्यातील पहिल्यांदाच अनुभव आला. ज्येष्ठांची कशी काळजी घ्यावी, हे शिकायला मिळाले.
सागर खडपे (रा. राजापूर) : वडिलांमुळे मलाही या योजनेचा लाभ मिळाला. ही योजना छान आहे. ज्येष्ठांना अशक्यप्राय आसणारी ही यात्रा या योजनेमुळे शक्य झाली. पालकमंत्र्यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन केले. समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी आतिशय चांगली काळजी ज्येष्ठांची घेतली. आई-वडलांमुळे रामाचे दर्शन मला झाले.
राजेंद्र कदम (रा. देवरुख अंगवले मार्लेश्वर) : अयोध्या सहला सुरेख झाली. नियोजन उत्तम होते. प्रवास छान झाला. पालकमंत्री उदयजी सामंतसाहेबांचे विशेष आभार मानतो.



