सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ संपन्न

रत्नागिरी : १० जुलै १९५७ हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी (२१.११.१९२१ ते १२.०९ २०१४) यांनी डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही (२७.०५.१९१८ ते २६.०९.२०१०) यांच्या सहकार्याने भारतीय प्रमुख कारप माशांच्या प्रेरेई प्रजानामध्ये पहिले यश संपादन केले होते. यामुळेच भारतीय कार्प माशांचे बिजोत्पादन आणि परिणामी त्यांचे संवर्धन करण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली. याचे फलित म्हणून पुढे भारतामध्ये ‘निल क्रांतीची’ मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले जाते. दिनांक १० जुलै या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस संपूर्ण देशभर मत्स्य शेतकऱ्याकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचे हे २५ वे वर्ष देखील मोठ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रा’मार्फत साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून संशोधन केंद्रामध्ये ‘शोभिवंत मत्स्यपालन: इंद्रधनु क्रांतीकडे वाटचाल’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

चर्चासत्राचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख, डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, तसेच मुंबईतील जेष्ठ मत्स्य व्यावसाईक श्रीराम हातवलने यांच्या हस्ते आणि आणि इतर मान्यवरांद्वारे डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
चर्चासत्राच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये उपस्थित शोभिवंत मत्स्य व्यावसायिकांची स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी, प्रा.डॉ. आसिफ पागरकर, तसेच रत्नागिरी शोभिवंत मत्स्य पालक संस्थेचे अध्यक्ष फहद जमादार, सदस्य श्रीराम हातवलने, विस्पी मिस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातून तसेच बेळगाव (कर्नाटक) आणि गोवा राज्यातील जवळपास ४० शोभिवंत मत्स्य व्यावसायिक उपस्थित होते.

डॉ. आसिफ पगारकर यांनी प्रास्ताविक करताना राज्यात मत्स्य शेतीमधील संशोधन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणारी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र ही मातृसंस्था असल्याचे नमूद केले. यु.एन.डी.पी. प्रकल्प, कांदळवन कक्ष, रत्नागिरीचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश भाटकर यांनी कांदळवनातील विविध मत्स्यशेतीचे प्रकार आणि त्यासाठी असलेले अनुदान योजना यांचे सादरीकरण केले. या चर्चासत्र दरम्यान विविध मत्स्य व्यावसायिकांनी मार्गदर्शन केले. श्रीराम हातवलणे यांनी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय वृद्धीसाठी शासनाने हाथभार लावला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली. तर विस्पी मिस्त्री यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे अशी आशा व्यक्त केली.
यावेळी नितीन बापट (जळगाव), जावेद म्हेतर, (कोल्हापूर), विकास पाटील (बेळगाव), मन्सूर पाटील (गडहिंग्लज), चेतन साळुंके (पुणे), राकेश सावंत (घाटकोपर, मुंबई), रूपाली व जगदिश मुकादम (कल्याण, ठाणे), मुबारक सुतार (कागवाड, बेळगाव) या सर्वांनी आपण सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात विविध प्रशिक्षण केले असल्याचे सांगताना, प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनांचा व्यवसायामध्ये उपयोग होत असल्याचे सांगितले.
राजकिरण साटम (दहिसर, मुंबई), दिग्विजय गोरे, सचिन सुवारे (रत्नागिरी), सुयोग भागवत, (रत्नागिरी), अल्बर्ट अमन्ना (अंबरनाथ, ठाणे), किशोर सामंत (कुर्ला), तनवीर सईद (मुंबई), मॅथु डिसिल्वा, डॉ. सुबिन मॅथु व मयूर देव (मुंबई) यांनी चर्चासत्रामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी शेवटच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व सक्रीय शोभिवंत व्यावसायिकांना या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल आणि चर्चासत्रामध्ये सहभागाबद्दल प्रशंसापत्रक देण्यात आले.

आपले अध्यक्षीय भाषण करताना डॉ. केतन चौधरी यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यावसायिकांनी एकत्र आल्यास व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर करण्यास एकमेकांची मदत होऊ शकते असे सांगितले. याच सहकाराच्या भावनेतून ‘रत्नागिरी शोभिवंत मत्स्य व्यवसायिक’ या संस्थेची निर्मिती झाली त्याबद्दल त्यांनी या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. तसेच त्यांना लागणारे सहकार्य भविष्यातही करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपूर्वा सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन साटम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक व प्रा. डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही. आर. सदावर्ते, श्रीमती ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, मत्स्यालय यांत्रिक मनिश शिंदे, वरिष्ठ लिपिक श्रीम. जे. जे. साळवी, लिपिक सचिन पावसकर, बोटमन दिनेश कुबल, शिपाई सुहास कांबळे व राजेंद्र कडव, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, प्रशांत पिलणकर, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम व अभिजित मयेकर यांनी परिश्रम घेतले.



