
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगलीसह अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. सांगलीमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवसात आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ होत असल्यामुळं दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होत असताना हवामान खात्याकडून याबद्दलचा मोठा इशारा दिला आहे. परिणामी अवकळी पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.



