गुहागर तालुक्यातील पडवे गावात शांतता कमिटीची सभा उत्साहात
गावातील एकोपा आणि विकासावर भर कायम राहणार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पडवे गावात निर्मल ग्रामपंचायत पडवे यांच्या वतीने शांतता कमिटीची सभा अत्यंत उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात झाली. पडवे उर्दू शाळा येथे आयोजित या सभेला उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राजमाने (रत्नागिरी) आणि गुहागर पोलिस निरीक्षक सचिन सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या सभेची सुरुवात सरपंच मुजीब जांभारकर यांनी आलेल्या मान्यवरांचे या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महत्त्वाची भूमिका मांडताना पडवे गावाकडून पोलिस प्रशासनाला नेहमीच चांगले सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले. दोन्ही समाजाने एकमेकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन शांतता राखावी, असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.

प्रमुख वक्ते उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राजमाने (चिपळूण) यांनी आपल्या मनोगतात गावाच्या निसर्ग संपन्नतेचे कौतुक करत पडवे गावात येण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती, आज तो योग जुळून आला आहे असे सांगून मच्छीमारीव्यतिरिक्त जर पर्यटनपूरक व्यवसाय उभारले गेले, तर नव्या पिढीला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. किरकोळ वाद हे संवादाअभावी निर्माण होतात. गावात शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि आम्ही पोलिस प्रशासन म्हणून विकासात्मक कार्याला कायम सहकार्य करत राहू, असा शब्द दिला.
सरपंच श्री. जांभारकर यांनी स्वागत करताना सांगितले की, “गावातील हिंदू समाजाकडून ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी नेहमीच सकारात्मक सहकार्य लाभत आले आहे. भविष्यातही हिंदू-मुस्लिम समाजात कोणत्याही प्रकारचा गैरसमज झाला, तर आम्ही पुढाकार घेऊन एकोपा टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहोत.”
या सभेला बीट अंमलदार श्री. तडवी, मकबूल जांभारकर, मुस्तर खले, पोलिस पाटील अनंत गांधी, पराग कोळवणकर, सुमेध सुर्वे, अमजद खले, नजीर जांभारकर, अमानत जांभारकर, संतोष गडदे, विनायक मयेकर, वसंत राऊत, विलास सुर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार गडदे, नईम माखणकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शवकत जांभारकर यांनी केले, तर माजी उपसरपंच सुजेंद्र सुर्वे यांनी मान्यवरांचे आभार मानले.



