मुख्य बातमी
१६ जूनपर्यंत ड्रोन तसेच मानवरहित हवाई वाहन उड्डाणास मनाई

रत्नागिरी : जिल्ह्यात १७ मे ते १६ जून २०२५ या कालावधीत ड्रोन किंवा इतर कोणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांकडून ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होवू शकतो आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये ड्रोन किंवा इतर कोणतेही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.



