बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा शिवसेना नेते विनायक राऊत विचारणार जाब
२२ मे रोजी बीएसएनएल कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेणार

रत्नागिरी : सध्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सेवेचा बोजवारा उडाला असून, अनेक ठिकाणी रेंज न येणे, नेटवर्क नसणे या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागात अनेक दिवस नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू असून, रेंज गायब असल्याने बीएसएनएलचे ग्राहकही हैराण झाले आहेत. याची दखल घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (२२ मे) सकाळी ११ वाजता रत्नागिरी बीएसएनएल जिल्हा न्यायालयासमोरील कार्यालयात भोंगळ कारभाराबद्दल जाब विचारण्यात येणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार असताना श्री. राऊत यांनी अनेक मोबाईल टॉवर मंजूर केले होते, तसेच बीएसएनएलच्या सुविधाही सुधारल्या होत्या; मात्र, आता अनेक गावांतील मंजूर टॉवरची कामे रखडली आहेत आणि बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक टॉवर नादुरुस्त अवस्थेत बंद आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार श्री. राऊत यांनी बीएसएनएल कार्यालयाला जाग येण्यासाठी स्वतः उपस्थित राहून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी कोर्ट समोरील बीएसएनएल कार्यालयात आपल्या समस्या घेऊन उपस्थित राहावे. अन्यथा 9273094605 या नंबरवर आपल्या समस्या पाठवाव्यात, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांनी केले आहे.



