कोळंबे कुटुंबियांचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून सांत्वन; मदतीचा धनादेश सुपूर्द

दापोली : कोकणात मान्सूननंतर दापोली तालुक्यात वणंद येथील नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने राजेश सोनू कोळंबे यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या सगळ्या दुर्घटनेची दखल घेत तातडीने शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाला धीर दिला व शासनाकडून मिळणाऱ्या ४ लाखांच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला.
कोळंबे यांची सुकन्या प्रज्ञा हिला बारावीत ८३ टक्के मार्क मिळाले आहेत. बारावीला असलेली प्रज्ञा हिची शैक्षणिक माहिती घेत कोणती मदत लागली तर मला सांगा मी तुमच्या बरोबर आहे अशा शब्दात योगेश कदम यांनी कोळंबे कुटुंबीयांना यांना धीर दिला. तसेच प्रज्ञा हिचा लहान भाऊ इयत्ता दहावीमध्ये आहे. या दोन्ही मुलांनाही योगेश कदम यांनी दिला. त्यावेळी तहसीलदार अर्चना बोंबे यांनीही कोळंबे यांच्या पत्नी त्यांना धीर देत कोणतेही मदत लागली तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत झालेल्या दुर्घटनेनंतर तुम्हाला कुटुंबासाठी आता खंबीर व्हावे लागेल, अशा शब्दांत सांत्वन केले.

यावेळी दापोलीचे प्रांतधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, भगवान घाडगे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर कालेकर, जि. प. माजी सदस्य चारुता कामतेकर, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य निलेश कांगणे, माजी उपसरपंच किशोर काटकर, माजी नगरसेवक सचिन जाधव, मोहन शिगवण, सुनील गुरव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गावात ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणीही नवीन पुलासाठी तातडीने मंजुरी देऊन त्याची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला योगेश कदम यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या छोट्या पुलामुळे दरवर्षी येणारे पाणी व त्यामुळे होणारा खोळंबा व दुर्घटना घडण्याची भीती या सगळ्याची तातडीने दखल योगेश कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे वणंद ग्रामस्थांची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.


