प्रशिक्षणाला वेळेत पोहचण्याच्या घाईमुळे चिपळूण ते रत्नागिरी जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनी बसचा मोठा अपघात
प्रशासन प्रशिक्षणार्थींचे बळी घेणार काय, शिक्षण क्रांती संघटनेचा सवाल

रत्नागिरी : एक दिवस जरी प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात किंवा हजेरी ॲानलाईन अपलोड केल्यानंतर पोहचलात तर संपूर्ण प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतव्याच्या भीतीमुळे आज सकाळी (८जून) चिपळूण वरून रत्नागिरी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला असून अनेक प्रशिक्षणार्थी त्यात गंभीर जखमी झाले आहेत.
प्रशिक्षणाकरीता ७५ टक्के हजेरी ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना सुरूवातीपासून आग्रही आहे; मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आपला १०० टक्के उपस्थितीचा हेका सोडायला तयार नाही. प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे बळी घेतल्यानंतर प्रशासन सवलत देणार आहे काय असा संतप्त सवाल शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी उपस्थित केला आहे.
जवळच्या नातेवाकाचे निधन, अकस्मात येणारे आजारपण, वाहतूक कोंडी, अपघात या गोष्टी सांगून येत नाहीत. याकरीता प्रशिक्षणातील उपस्थिती १०० टक्के ऐवजी ७५ टक्के करण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना आग्रही आहे. संचालक ऐकत नसतील तर याबाबतचा शासन आदेश निर्गमित करावा असा पर्याय ही संघटेकडून सूचवण्यात आला आहे. मात्र कुणीही दाद देत नाही. त्यामुळे मुकी बिचारी कुणीही हाका असे शिक्षकांबद्दल पुन्हा एकदा म्हणण्याची पाळी आल्याचे घागस यांनी सांगितले.


