त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महायुती सरकारने मोठा त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आम्ही राज्यात आम्ही मराठी अनिवार्य केली, हिंदी पर्यायी ठेवली आहे. झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्यांना नाही असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर साधला.
पुढे ते म्हणाले की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार आहे. समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार सध्या याबाबतचे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करतोय असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) अंतर्गत प्रस्तावित त्रिभाषा सूत्रानूसार १६ एप्रिल २०२५ रोजी सरकारने हिंदीला इयत्ता पहिलीपासून अनिवार्य तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यात येणार होती.



