मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबाबत डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांचे थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

आबलोली (संदेश कदम) : मुंब्रा येथे झालेली दुर्घटना हा अपघात नसून रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे झालेली ही घटना आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, जखमी प्रवाशांवर योग्य ते मोफत उपचार व तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश अरुण कदम यांनी पत्राद्वारे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेबाबत डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये चार जणांचा हकनाक बळी गेला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत अनेक राजकीय पक्ष, रेल्वे संघटना यांनी आवाज उठवला; परंतु ज्या मार्गावर दुर्घटना घडली तेथे प्रत्यक्ष जाऊन मी प्रवास करणाऱ्या प्रवासी यांच्या व्यथा व म्हणणे जाणून घेऊन आपणास विनंतीपूर्वक कळवतो की, काल झालेली दुर्घटना हा अपघात नसून रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे झालेली ही घटना आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, जखमी प्रवाशांवर योग्य ते मोफत उपचार व तात्काळ मदत करण्यात यावी.”
“काल संध्याकाळी मी स्वतः दुर्घटनास्थळी जाऊन पहाणी केली. यामध्ये असे निदर्शनास आले की, मुंब्रा खाडीपासून ते मुंब्रा स्टेशन पर्यंतचा रेल्वे रुळ हा (s) इंग्रजी एस अक्षराच्या वळणाचा आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील लोकलचा स्पीड या ठिकाणी जास्त प्रमाणात वाढल्यास आतील प्रवाशी एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे असे फेकले जातात. त्यात कालच्या दुर्घटनेत ट्रेन ही कसारा येथून म्हणजेच दूरच्या अंतरावरून आली असल्याने आणि विशेष बाब म्हणजे ही ट्रेन दिवा हॉल्ट असल्याने ही दुर्घटना घडली असावी असा माझा अंदाज आहे.”
कारण हा फास्ट ट्रेनला डोंबिवली स्टेशनला प्लॅटफॉर्म हा उजवीकडे येतो व पुन्हा ठाणे स्टेशनचा प्लॅटफॉर्म हा उजवीकडे येतो. त्यामुळे दिव्याला चढलेले प्रवाशी आणि ठाण्याला उतरणारे प्रवाशी यात दरवाजावर संघर्ष निर्माण होतो. म्हणूनच माझी या पत्राद्वारे आपणास विनंती आहे की, ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या (उदा. कर्जत, कसारा, खोपोली) या ट्रेनचा दिवा हॉल्ट रद्द करावा व त्याऐवजी दिवा स्टेशनवरून एखादी दुसरी लोकल सोडावी तसेच मुंब्राच्या टर्निंग स्पॉटवर स्पीड लिमीट कमी करण्याचे निर्देश मोटारमॅन यांना देण्यात यावे व मुंब्रा स्टेशनवरील रेल्वे रुळ जो एक “वर” व एक “खाली आहे त्यांना समांतर लेव्हलला करावे जेणेकरून ट्रेन एका बाजूला जास्त प्रमाणात झुकली जाणार नाही व ही दुर्घटना घटणार नाही, अशा आशयाचे लेखी पत्र गणेश अरुण कदम (८८७९७७६२८२ ,सामाजिक कार्यकर्ते डोंबिवली) यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना पाठवले आहे.



