मुख्य बातमी

सर्वसामान्यांना आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

गोळप आणि पावस येथील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वाटप

रत्नागिरी : जन्मापासून, मृत्यूपर्यंत ज्या-ज्या काही अडचणी येतात त्याला आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना आहे. घरामध्ये मुलगी जन्माला आली, तरी आम्ही निधी देतो. घरामध्ये दुसरी मुलगी जन्माला आली, तरी आपण तिथे देतो. दुर्दैवाने अपघात झाला तरी देतो. दुर्दैवानं अपघातामध्ये कर्ता पुरुष जर निघून गेला, त्याचे निधन झालं, तरीदेखील मदत देतो. शिक्षणासाठी आपण साठ साठ हजार रुपये आपण देतो म्हणून, ही योजना काही लोकांपुरती मर्यादित न राहता, जनसामान्यांपर्यंत पोहचली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही योजना तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. योजनेचा दुरुपयोग भ्रष्टाचारासाठी जर कोण करत असेल, तर त्याच्यावर १०० टक्के पोलिस कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि पावस येथील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, दोन वर्षांपूर्वी कामगार विभागाची घेतलेली ही चळवळ, जी ९ हजार लोकांच्या कामगार नोंदणीला सुरू झाली होती, ती नोंदणी ५६ हजारवर जाऊन पोहोचलेली आहे. कुटुंबाला कामगार विभागाचा लाभ देण्याची योजना आहे. या वस्तू बघितल्या असतील. त्याची किंमत देखील आपल्याला माहिती असेल. घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत. त्या दहा हजार रुपये किंमतीच्या आहेत. या दहा हजाराच्या वस्तू तुम्हाला मोफत देत असताना, काही लोकांनी याच्यामध्ये दलाली देखील केलेली आहे. फॉर्म भरायला पाचशे रुपये, वस्तू द्यायला पंधराशे रुपये असा एक व्यापार देखील काही लोकांनी सुरू केला. तो व्यापार बंद करण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या.

फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले असतील, या वस्तू देण्यासाठी पैसे घेतले असतील आणि तशी तक्रार जर माझ्या कार्यालयाकडे किंवा माझ्याकडे आपण केली तर त्याच्यावर पोलीस कारवाई करु. कारण, तुमच्या हक्काच्या वस्तू आहेत. सगळ्यांसाठी कामगार विभागाने ही योजना खुली केली. मला सांगताना आनंद होतोय, की ज्या पद्धतीने हिंदू धर्मातल्या लोकांना या योजनेचा लाभ होतोय, तसं माझ्या मुस्लिम भगिनींना देखील या योजनेचा लाभ होतोय.

मुस्लिम भगिनी देखील सुरक्षित राहिली पाहिजे. त्यांची मुलं देखील सुरक्षित राहिली पाहिजेत. म्हणून साडेआठ कोटी रुपये खर्च करून अल्पसंख्याक समाजाचे वस्तीगृह आम्ही बांधले. सोफिया कुरेशींनी स्वतः फायटर प्लेन उडवून जगाला नेतृत्व दाखवलं. सोफिया कुरेशी याच देशांमध्ये जन्माला आली, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे.

तालुक्यांमध्ये माझ्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते असे आहेत, त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील, युवा वर्ग असेल, पदाधिकारी असतील, स्वतः मेहनत घेऊन ही योजना लोकांच्या घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करतात. वाडीवस्त्यांवर जाऊन ही योजना लोकांवर नुसती पोहोचवत नाहीत, तर या योजनेतल्या वस्तू त्यांना देण्याचं काम करत आहेत. अशा लोकांना देखील आपण पाठबळ दिले पाहिजे, असेही शेवटी ते म्हणाले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, कामगार त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!