जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अपिल प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी २६ सप्टेंबर रोजी लोक अदालत

रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्यातर्फे अपिल प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालत २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, रुम नं. २०१ रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख एस. एस. इंगळी यांनी केले आहे.
लोक अदालतमध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडील प्रलंबित अपिल प्रकरणावर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय देण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपिलामधील दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करून ही अपिल प्रकरणे कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी संबंधित नागरिकांनी किंवा अपिलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित रहावे. जेणेकरून प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. लोक अदालतीद्वारे तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून त्यामुळे वेळेची व संसाधनाची बचत होणार आहे.
याबाबतची माहिती collectormumbaisuburban.gov.in या वेबसाईटवर विभाग भूमि अभिलेखच्या पेजवर प्रसिद्ध केली आहे.



