माणुसकी हाच धर्म पाळणाऱ्या फरीद तांडेलचा आज होणार सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील रनपार समुद्रात बोट पलटून बुडणाऱ्या १६ जणांना वाचविण्याऱ्या फरीद तांडेल याचा संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आज (२ मे) रोजी सायंकाळी ७ वाजता सुहेल मुकादम यांच्या जयस्तंभ रत्नागिरी येथील कार्यालयात यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
रनपार समुद्रात आपल्याच इथली १६ तरुण फिरण्यासाठी बोटीतून प्रवास करीत होती, दुर्दैवाने बोट समुद्रात बुडू लागली आणि या १६ तरुणांना मृत्यू समोर दिसत होता, अशा प्रसंगी देवासारखा एक दूत फरीद तांडेल याच्या लक्षात ही भयंकर घटना आली आणि त्याने जीवाची पर्वा न करता त्या बुडणाऱ्या १६ तरुणांना सुखरूपपणे किनाऱ्यावर आणले.
जात, धर्म याचा विचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला ही चपराक आहे. फरीदने या तरुणांना जात धर्म नाही विचारले फक्त आपले बांधव संकटात आहेत याचाच विचार केला आणि त्यांना जीवदान दिले. अशा या फरीदच्या कार्यामुळे माणुसकी हीच एक जात आहे हे अधोरेखित झाले. हा संदेश संपूर्ण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपले ऐक्य अबाधित राहिले पाहिजे. तर मग अशा अवलिया चा सन्मान करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



