जिल्ह्यात बळीराज सेना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार
जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची माहिती

आबलोली (संदेश कदम) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बळीराज सेना आपले उमेदवार देणार असल्याचे संकेत जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी दिले आहेत.
याबाबत बोलताना श्री. कांबळे यांनी सांगितले आहे की, आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. सक्षम कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उतरविण्याचा विचार आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागरमध्ये उमेदवार तयार आहेत, तर दक्षिण रत्नागिरी तालुक्यांतील उमेदवार निश्चित होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बळीराज सेना ही सर्वसामान्य जनतेची आहे. उच्च शिक्षित नव तरुण कार्यकर्ते यांना या निवडणुकीत संधी देणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत नियोजित कोकण दौरा करण्यात येणार असून, बळीराज सेनेच्या वतीने गाव पातळीवरील उमेदवारासंदर्भात चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. दरम्यान कोकणात बळीराज सेना पक्षाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार आगामी निवडणुकीत देण्यात येणार असून, मतांचे विभाजन होणार आहे तरीही बळीराज सेनेची ताकद मोठी आहे. कारण या पक्षाकडे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते पक्षाशी प्रमाणिक आहेत व जनतेची कामेही ते प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे आम्हाला यश मिळणार हे नक्की आहे, असा विश्वासही जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी व्यक्ती केला.



