आनंद जाधव यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र आणि शिव प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि भरीव कामगिरीची दखल घेत त्यांना नुकतेच ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवराम जाधव गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना दिवंगत आई-वडील शिवराम जाधव आणि प्रभावती जाधव यांच्या समाजसेवेचा वारसा आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान करत ‘दिशा महाराष्ट्राची’ संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे कवी संमेलन आणि राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात तुषार गौतम नेवरेकर, कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रोहिणी दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक, साहित्यिक आणि कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, जुईनगर स्टेशन जवळ नवी मुंबई येथे आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन तुषार नेवरेकर आणि सौ. सपना नेवरेकर यांनी केले होते.



