मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा : सत्यवान रेडकर

आबलोली (संदेश कदम) : कुणबी समाज आता केवळ शेतीव्यवसायाशी संबंधित राहिलेला नाही. हा समाज ओबीसी प्रवर्गातून सुखसंपन्न झाला आहे आणि भविष्यातही उच्च शिक्षण घेऊन जास्तीत जास्त ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष करून कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला भारत सरकार मुंबई सीमा शुल्क कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवनच्या लोकनेते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृह येथे कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर ग्रामीण व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सत्कार सोहळा विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाज शाखेचे माजी अध्यक्ष आणि पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या व शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात झाला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत सरकारच्या मुंबई सीमा शुल्क कनिष्ठ अनुवाद अधिकारी श्री. रेडकर म्हणाले की, “मी कधीही इतरांशी स्पर्धा करत नाही; परंतु मी स्वतःची स्पर्धा स्वतः करतो आणि पुढे जातो. शिक्षणाचे महत्त्व काय असते हे आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” अशा शब्दांत सांगितले. आज मी ३५६ वे मार्गदर्शन करतोय एक रुपया सुद्धा मानधन घेत नाह, त्याचे कारण म्हणजे लोक अन्नदान करतात, रक्तदान करतात; पण महाराष्ट्रामध्ये हा सत्यवान यशवंत रेडकर ज्ञानदान करतो आणि ज्ञानदानाच्या बदल्यात मी कधीही मानधन मानधन घेत नाही.”

“प्रशासकीय व्यवस्थेत आमची मुलं दिसायला पाहिजे, कारण प्रशासकीय व्यवस्थेत आमची मुलं दिसली नाही तर तुम्ही इतरांच्या हातात प्रशासकीय सत्ता देणार. जशी राजकीय सत्ता आमच्या हातात असणे गरजेचे आहे ना तसेच प्रशासकीय सत्ता सुद्धा आमच्या हातात असली पाहिजे. आपल्या हातात प्रशासकीय सत्ता असणे गरजेचे आहे. माझा भूतकाळ हा अंधार नव्हता म्हणून मी एक चळवळ उभी केली. तिचं नाव आहे ‘तिमिराकडून तेजाकडे’. मी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून सत्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे काम करतो. आज आम्ही मागासवर्गीय असलो, तरी शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्ही समृद्ध झालो आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे स्पष्ट मत सत्यवान यशवंत रेडकर सर यांनी व्यक्त केले. यावेळी रामचंद्र गुरुजी, मुंबई शाखेचे अध्यक्ष अनंत मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, ग्रामीण शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ सल्लागार गणपत पाडावे, सरचिटणीस प्रदीप बेंडल, माजी सभापती विलास वाघे, श्रीमती वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, अनंत पागडे, विजय पागडे, रामचंद्र आडविलकर, रामाणे गुरुजी, भालचंद्र जोगळे, शंकर मोरे, शंकर ठोंबरे, महादेव वणे, अमोल वाघे, वैभव आदवडे, अनिल घाणेकर, उदय गोरीवले यांच्यासह समाज शाखेचे पदाधिकारी आणि पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बेंडल यांनी केले. तुकाराम निवाते यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!