कॉम्रेड मॅरेथॉन धावणारे धावपट्टू प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीत झाले स्वागत

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परत आलेल्या धावपटू, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचे साळवी स्टॉप येथे स्वागत करण्यात आले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनची टीम आणि रत्नागिरीकरांच्या वतीने याचे आयोजन केले. विमान अपघात व मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहून व स्वागताची दुचाकी रॅली रद्द करून रत्नागिरीकरांनी समाजभान राखले.
साळवी स्टॉप येथे शहराच्या प्रवेशद्वारापाशी ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी संदीप तावडे, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध यांनी प्रसादचे पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहार घालून अभिनंदन केले.
मनोगत व्यक्त करताना प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले की, आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये २२ हजार स्पर्धक धावतात. त्यात १६ हजार आफ्रिकेतील असतात. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. आपणही कोकणात कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आयोजित करतो. ती यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीने धावायला पाहिजे तसेच परदेशांतूनही अनेक धावपटू या स्पर्धेसाठी नक्कीच येतील. देशातील विविध ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्या अनुभवाच्या आधारे व कोच दादासाो सत्रे यांचे मार्गदर्शन घेऊन मी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. कुटुंबियांच्या पाठबळामुळेही त्यांचे आभार मानतो. आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, मॅरेथॉनच्या टीमने केलेले स्वागत भारावून टाकणारे आहे. परंतु भीषण विमान अपघातामुळे आजचा कार्यक्रम लहान स्वरूपात करणे म्हणजे समाजभान राखणार शहर असल्याचे लक्षण आहे.
याप्रसंगी कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, संदीप पावसकर, नीलेश शाह, उद्योजिका सौ. कांचन चांदोरकर, सौ. तेजा देवस्थळी, अविनाश फडके, मानसी मराठे, सचिन मराठे, दर्शन जाधव, विनायक पावसकर, आशिष पावसकर, डॉ. नितीन सनगर, महेश सावंत, ॲड. सचिन नाचणकर, गजानन भातडे, नारायण पाटोळे, ओंकार फडके, सौ. दीप्ती फडके, अभिजित पड्याळ, प्रशांत आचार्य, हृषिकेश पुरोहित, डॉ. राज कवडे, योगेश कदम, हमाल पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आदींसह अनेकजण उपस्थित होते.
श्री. देवस्थळी यांचे साळवी स्टॉप ते मारुती मंदिरपर्यंत दुचाकी रॅलीद्वारे स्वागत करण्याचे ठरवण्यात आले होते; परंतु अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात शेकडो प्रवाशांनी प्राण गमावल्यामुळे रॅली स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


