“कोमसाप”चे विश्वस्त अरुण नेरूरकर यांचे निधन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) विश्वस्त, संस्थापक सदस्य अरुण अच्युत नेरुरकर (वय ८८) यांचे काल (७ ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. “कोमसाप”च्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासोबत संस्था वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेरूरकर गेल्यामुळे संस्थेचे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चर्मालय येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवळपास ३० वर्षे नेरूरकर हे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. रत्नागिरीच्या सांस्कृतिक वाटचालीत त्यांनी योगदान दिले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सहकार्याने हे संमेलन रंगले होते. आपल्या मृदू स्वभावामुळे त्यांनी अनेक संस्था आणि व्यक्ती जोडल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
नेरुरकर यांच्या जाण्याने कोमसापचा आधारस्तंभ हरपला आहे. कोमसापसह साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, कोमसाप परिवाराचा सर्वांना जोडून ठेवणारा महत्वाचा दुवा निखळल्याची जाणीव मनाला पोरकं करून गेली, अशी प्रतिक्रिया कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिता कीर यांनी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यात कोमसाप सर्वार्थाने उभी केली ती नेरुरकर यांनीच. त्यांनी कोमसापच्या आम्हा सर्वांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केलं, माया दिली, सूचना देखील केल्या. अखेरपर्यंत ते कोमसापसाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.



