दिव्यांग लाभार्थ्यांनी २३ मार्चपर्यंत नवीन यूडीआयडी कार्ड ई-केवायसीसह तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

रत्नागिरी : दिव्यांग लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून ज्या दिव्यांग लाभार्थ्यानी यूडीआयडी कार्ड काढलेले नाही त्या लाभार्थ्यानी २३ मार्चपर्यंत नवीन यूडीआयडी कार्ड काढून ते ई-केवायसी करून तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत गाताडे यांनी केले आहे.
दिव्यांग लाभार्थ्याच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करून २ हजार ५०० इतके अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येत आहे. त्यासाठी लाभर्थ्याचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) डीबीटी पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे यूडीआयडी व आधार संलग्नीकरण करण्याबाबत आढावा बैठकीत जिल्हयातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील एकूण २९६८ लाभार्थी यूडीआयडी व आधारशी संलग्न नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
यावेळी लाभार्थ्याची माहिती डीबीटी पोर्टलव्दारे माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी केलेले यूडीआयडी कार्ड संजय गांधी योजना शाखेत जमा केलेले नाही, त्या लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी केलेले यूडीआयडी कार्ड तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावेत.



