‘ऑफ्रोह’ रत्नागिरीचे अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन

रत्नागिरी : अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऑफ्रोह रत्नागिरीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. ऑफ्रोह रत्नागिरीच्या व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जयस्तंभ येथील रस्त्याच्या शेजारीच उन्हात बसून हे आंदोलन केले.

अनुसूचित जमातीतील कर्मचारी पदोन्नतीत पात्र होऊनही नियमित पदोन्नती तसेच १०,२०,३० वर्षानंतरचे आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्यात यावेत, शासनाच्या कॅबिनेटच्या निर्णयानंतर उपसचिव सुदाम आंधळे यांनी बेकायदेशीररित्या निर्गमित केलेले १८ सप्टेंबर २०२५ चे परिपत्रक रद्द करावे, अधिसंख्य पदावर वर्ग न झालेल्या परंतु मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांचे थांबविण्यात आलेले सेवानिवृत्त वेतन देण्यात यावेत, सेवासमाप्त कर्मचारी यांना सेवेत घेतल्यानंतर
काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतनाचा लाभ देण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
‘ऑफ्रोह’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे व ऑफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. उषा पारशे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकांचा विजय असो’, ‘हमारी मांगे पुरी करो, ‘अधिसंख्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी जयस्तंभ परिसर दुमदुमला.
ऑफ्रोह रत्नागिरीच्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी रत्नागिरी यांना देण्यात आले. निवेदन देताना ‘ऑफ्रोह’चे जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, कार्याध्यक्ष बापुराव रोडे, कोषाध्यक्ष सतीश घावट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे, सहसचिव प्रतिभा रोडे उपस्थित होते.
आंदोलनात ऑफ्रोह रत्नागिरीचे कार्याध्यक्ष बापुराव रोडे, उपाध्यक्ष नंदा राणे, कोषाध्यक्ष सतीश घावट, विलास घावट, तुळशीराम केळगणे, विलास देशमुख, महिला आघाडी उपाध्यक्ष सुनंदा फुकट, कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, सहसचिव प्रतिभा रोडे, सुरेखा घावट व इतर सभासदांनी सहभाग घेतला.
शासनानी या आंदोलनाची दखल घ्यावी, असे आवाहन ऑफ्रोहचे कार्यकारी राज्याध्यक्ष राजेश सोनपरोते, महासचिव डाॅ. दीपक केदार, प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी राज्याध्यक्षा अनघा वैद्य यांनी केले आहे.



