राजापूर पालिकेकडून प्लास्टिक बंदीची कारवाई; ६ हजारांचा दंड, ९.५०० किलो प्लास्टिक जप्त

राजापूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या सूचनेनुसार व कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज (११ जून) आठवडा बाजार परिसरात प्लास्टिक बंदीविषयी विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ६ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला, तसेच ९.५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले.
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून नागरिक व व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करून प्लास्टिकमुक्त शहर निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये पर्यावरण व यांत्रिक अभियंता सुप्रिया पोतदार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सुशील यादव तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. राजापूर नगरपालिकेकडून भविष्यातही अशा प्रकारच्या प्लास्टिक बंदीविषयक तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


