मुख्य बातमी

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे (स्वायत्त) रत्नदुर्ग किल्ला परिसरात देशी वृक्षांच्या ‘बीजगोळ्यांचा प्रसार व बीज लागवड’

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रत्नदुर्ग किल्ला परिसरात, भगवती मंदिराजवळ बीजगोळे प्रसार व बीज लागवड उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात वनस्पतीशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमांतर्गत फणस, मोह, चिंच, रिठा आणि आंबा या स्थानिक व देशी वृक्षांच्या बियांचे बीजगोळे तयार करून किल्ला परिसरातील योग्य ठिकाणी त्यांचा प्रसार करण्यात आला. तसेच काही ठिकाणी बियांची थेट लागवडही करण्यात आली. देशी वृक्षांचे संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि किल्ला परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

‘बीज पसरवा, निसर्ग फुलवा!’ या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने बीजगोळे प्रसार व बीज लागवडीत सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून देशी वृक्षांचे महत्त्व आणि जैवविविधता संवर्धनाची गरज समजावून घेण्याची संधी मिळाली. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. गुरव यांनी केले. भगवती मंदिर परिसरात बीज लागवडीसाठी प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके आणि श्रीम. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी स्वतः सहभाग घेत बीज लागवड केली.

देशी वृक्षांच्या बियांचा प्रसार करून त्यांच्या नैसर्गिक पुनरुत्पादनाला चालना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. आज पेरलेले बीज उद्याच्या समृद्ध वनसंपदेची सुरुवात ठरेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!