मुख्य बातमी

‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’; जिल्हास्तरीय निवड समिती गठित

विजेत्या मंडळांना मिळणार ५०, ४० व ३० हजारांची रोख पारितोषिके; गुणांकनाच्या आधारे होणार पारदर्शक निवड

रत्नागिरी : गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करताना शासनाच्या उपक्रमांतर्गत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सात सदस्यीय जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली आहे.

अशी असेल जिल्हास्तरीय निवड समितीची रचना – अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), शासकीय सदस्य: पोलिस उपअधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अशासकीय सदस्य: समीर इंदूलकर आणि राहुल कळंबटे, सदस्य सचिव: जिल्हा नियोजन अधिकारी. तालुकास्तरावरून प्राप्त झालेले परीक्षण अहवाल, छायाचित्रे, व्हिडिओ (चलचित्रे) आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार मंडळांचे गुणांकन केले जाईल. प्राप्त गुणांनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल. दोन किंवा अधिक मंडळांना समान गुण मिळाल्यास, ज्या मंडळाची स्थापना अधिक वर्षांपूर्वी झाली आहे, त्या जुन्या मंडळाला प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेत कोणत्याही परिस्थितीत विभागून पारितोषिक दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रथम तीन क्रमांक विजेत्या मंडळांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!