जिल्ह्यात जि.प. गटासाठी १५१, पं.स. गणासाठी ३२१ उमेदवार रिंगणात
गटातील ४९ जणांची, तर गणात १०१ जणांची माघार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटात ४९, तर पंचायत समिती गणातील १०१ अशा एकूण १५० उमेदवारांनी माघार घेतली. आता रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गटासाठी १५१, तर पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघे घ्यावेत यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात काही अंशी यश आले आहे. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती निश्चित झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी २२६, तर पंचायत समितीसाठी ४४४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. या कालावधीत गटातील ४९ जणांनी तर गणातील १०१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोरीचा फटका चिपळूण, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्याला बसलेला आहे. रत्नागिरी तालुक्यात हातखंबा गटात शिंदे शिवसेनेतील बंडखोरी कायम आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील उमरोली गटात बंडखोरी कायम आहे. संगमेश्वरमध्ये भाजप आणि शिवसेना हे एका गटात आमनेसामने आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळालेल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सूर उमटत आहेत. त्याचा किती परिणाम होतो, हे पुढील चार दिवसात निश्चित होईल. या निवडणुकीत शिंदे शिवसेना विरूध्द ठाकरे शिवसेना अशीच रंगतदार लढत पहायला मिळणार आहे.
तालुकानिहाय अर्ज माघारी
तालुका जि. प. गट पं. स. गण
संगमेश्वर ३ १०
लांजा ४ ५
रत्नागिरी ८ ८
मंडणगड ६ ६
राजापूर ४ १६
चिपळूण ६ १५
गुहागर २ ३
खेड ८ १३
दापोली ८ २५
—————–
तालुकानिहाय रिंगणात असलेले उमेदवार
तालुका गट गण
* मंडणगड ६ १३
* दापोली १६ ३१
* खेड २० ५३
* गुहागर १२ २६
* चिपळूण २९ ५५
* संगमेश्वर २० ४२
* रत्नागिरी २६ ४३
* लांजा ९ २६
* राजापूर १३ ३२


