३१ गुन्ह्यांमध्ये ५० आरोपींवर कारवाई, ७ तडीपार : पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : ३१ गुन्ह्यांमध्ये ५० आरोपींवर कारवाई, ७ तडीपार केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (१२ एप्रिल) अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही नियंत्रण व जनजागृतीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “२०२४ मध्ये एकूण २५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ३९ आरोपींना अटक करण्यात आली. ७ लाख १५ हजार ६५० रुपयांचे २३१ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ६ लाख ६६ हजार ५४ रुपये किंमतीचा ३२.८५८.५ किलोग्रॅम गांजा आणि ५० लाख ८९ हजार ६०० रुपये किंमतीचे १२.७२० किलोग्रॅम चरस यात जप्त करण्यात आले आहे. २०२५ मध्ये ६ गुन्ह्यांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात २ लाख २६ हजार २५० किंमतीचे २५.४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ३ लाख ७६ हजार १९७ रुपयांचा ७.६१६.५ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ७ आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.”
क्षेत्रीय स्तरावरील पोलिस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


