मुख्य बातमी

पत्रकार कॉलनी शेजारी ‘बार’ सुरू करण्याच्या हालचालींना नागरिकांचा विरोध; पालकमंत्र्यांकडे तक्रार

रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील पत्रकार कॉलनी शेजारी नव्याने सुरू होऊ घातलेल्या ‘बार’ विरोधात परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी एकत्र येत सही मोहीम राबवून पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत तसेच लांजा- राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्याकडे यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, विकास सदाशिव चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घरात भाउबीज बंगला, ३/२१४, पत्रकार कॉलनी शेजारी, कुवारबाव, रत्नागिरी येथे बार सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे (Excise Department) परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून परिसराची पाहणीही झाली आहे.

या परिसरात शासनाच्या भूखंडावर पत्रकार कॉलनी, भूविकास कॉलनी अशा निवासी वस्त्या असून याच ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा व माने इंटरनॅशनल स्कूल देखील आहे. दररोज महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा संवेदनशील ठिकाणी बार सुरू झाल्यास परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, बार सुरू करण्यासाठी श्री. चव्हाण यांनी ग्रामपंचायत कुवारबावकडे परवानगी मागितली होती; मात्र ती ग्रामपंचायतीने स्पष्टपणे नाकारली आहे. असे असतानाही परवाना मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की, “या बारला कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच सामाजिक समतोल अबाधित ठेवण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी.”

याचबरोबर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, रत्नागिरी, पोलिस अधीक्षक, उत्पादन शुल्क निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रशासक/ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कुवारबाव या अधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आली आहे. या प्रकारावर तत्काळ कारवाई व्हावी आणि सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!