
मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना आणखी काही दिवस पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक ठरणारी वातावरणीय परिस्थिती सध्या अनुकूल नसल्यामुळे येत्या २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील बहुतांश भागांत केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान अंदाजाच्या विविध मॉडेल्सनुसार, २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभाग मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या वातावरणीय बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) यंदा ८ जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वेळेत प्रवेश केला होता. परंतु, त्यानंतरच्या काळात मान्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्राकडून मान्सूनच्या वाऱ्यांना पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेला जोरदार प्रवाह मिळत नाहीये. सर्वसाधारणपणे या प्रवाहामुळे समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होते, ज्यामुळे पावसाचा जोर वाढून मान्सून पुढे सरकण्यास मदत होते. मात्र, सध्या मान्सूनच्या प्रवाहाशी निगडित हवेच्या खालच्या थरातील नैर्ऋत्येकडील वारे अरबी समुद्रावर अत्यंत कमकुवत झाले आहेत. परिणामी, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि राज्याच्या अंतर्गत भागांकडे जाणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.



