उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन
सलग तिसरे वर्षे : यंदाच्या स्पर्धेतून विजेता संघ महाअंतिम स्पर्धेत दाखल होणार

रत्नागिरी : गेली २ वर्षे सातत्याने उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या २ वर्षांच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक वर्षी रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण व शहर भागांतून महिलांच्या २७५ ते २८० संघानी सहभाग नोंदवून प्रतिष्ठानच्या आयोजनावर विश्वास दाखवून ही मंगळागौर स्पर्धा यशस्वी केली आहे.
उदय सामंत साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मंगळागौर स्पर्धा प्रतिवर्षी श्रावण महिन्यात साजरी केली जात असून या माध्यामातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळत आहे, त्यांच्या गुणकौशल्याचा सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळाल आहे आणि पारंपारिक खेळ नविन पिढीला शिकायला मिळत आहेत व यामुळे सामाजिक संबंध दृढ होत आहेत.

यंदा देखील ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी केली जाणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्षे असून, स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर होताच ग्रामीण भागातील महिलांनी स्पर्धक संघानी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे कसे टाळावेत, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, महिलांची सुरक्षितता या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उदय सामंत प्रतिष्ठान गेली काही वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आता पर्यंत त्यांनी अनेक शिबिर आयोजित केली आहेत, त्याचा फायदा महिला वर्गाला झाला आहे. याचाच एक भाग म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षित आरोग्याचा संदेश देण्यासाठी आणि स्वत:ला माहिती असावी या उद्देशाने प्रत्येक महिलेचा रक्त गट व हिमोग्लोबिन तपासले जाणार आहे. व त्याचे कार्ड प्रत्येक महिलेला देण्यात येणार आहे.
यंदाच्या स्पर्धेतून प्रत्येक ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गटातून व शहरातून विजयी झालेल्या पहिल्या संघाला महाअंतिम स्पर्धेसाठी दाखल होण्याचा मान मिळणार आहे आणि ही महाअंतिम फेरी रविवार १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथील सावरकर नाट्य गृहामध्ये मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येणार आहे. एकूणच यंदाची ही मंगळागौर स्पर्धा अटीतटीची असेल आणि सादरीकरणामध्ये वेगळेपण असणारी असेल असा विश्वास उदय सामंत प्रतिष्ठानकडून व्यक्त केला जात आहे.
महिलांनी महिलांसाठी तयार केलेल हे व्यासपीठ त्यामधील सादरीकरण बघण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी अगत्याने यावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

