कार्यकर्त्यांनी पक्षपात विसरून जनतेसाठी काम करावे : आमदार किरण सामंत

संगमेश्वर : “जनतेच्या प्रश्नांवर काम करताना कोणताही पक्षपात न ठेवता सर्वसामान्यांच्या हितासाठी झटले पाहिजे. हाच खरा कार्यकर्त्यांचा धर्म आहे,” अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील भडकंबा येथे आयोजित गाव बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी ग्रामस्थांनी विविध समस्या बैठकीत मांडल्या. त्या समस्यांवर आमदार सामंत यांनी संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे करावे, असेही त्यांनी सांगितले.
लांजा, राजापूर व साखरपा विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना आमदार किरण सामंत यांनी ठाम भूमिका मांडली. “माझ्यासाठी जनता हीच खरी ताकद आहे. जाती-पाती वा राजकीय पक्षपाती न पाहता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणे हीच माझी जबाबदारी आहे. मतदारसंघातील विकासकामे व शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे स्पष्ट करतानाच “गावोगावी विकासाचा न्याय मिळवून देणे आणि तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना आधार, महिलांना सुरक्षितता व संधी देणे हेच माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
या भूमिकेचे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करत आमदार सामंत यांच्या कार्यपद्धतीला पाठिंबा दर्शविला. गावातील विकासकामे, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या विषयांवर देखील चर्चा झाली. बैठकीस मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



