टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामपंचायत तळवडे येथे एक्स-रे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी : ग्रामपंचायत तळवडे, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवडे आणि क्षयरोग पथक राजापूर, जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट रोजी टीबीमुक्त भारत अभियानअंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये टीबी प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत तळवडे येथील सरपंच सौ. गायत्री साळवी, उपसरपंच शांताराम साळवी, व सदस्या सौ. प्रेरणा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात टीबीमुक्त भारत अभियान यशस्वीपाणे राबविले जात आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीपीएम कोऑर्डिनेटर श्रीकांत सावंत,जिल्हा सुपरवायझर मंगेश पाटील, एक्स-रे टेक्निशियन श्रीहांगे, एसटीएस राहुल कोकणे, एसटीएलएस श्रीमती आचल मळेकर, तसेच राजापूर क्षयरोग पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र करत कारवली तिठा येथील आरोग्य सहाय्यक टी. बी. पाटील, के. व्ही. भांडे, आरोग्य सहायिका श्रीमती पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून एकूण १८५ रुग्णांची एक्स-रे व सीवायटीबी (CYTB) चाचणी करण्यात आली. टीबी मुक्त भारत या ध्येयाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ग्रामपंचायतीच्या, आरोग्य विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वी ठरले.



