मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘पुस्तकावर बोलू काही’ कार्यक्रम संपन्न

आबलोली : अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या दुसरा वर्धापन दिन महाकवी नामदेव ढसाळ यांना समर्पित जाहीर कविता वाचन आणि ‘पुस्तकावर बोलू काही’ हा कार्यक्रम चिपळूण येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे संपन्न झाला.

हा कार्यक्रम प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे यांच्या अध्यक्षतेखाली, तर भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे अध्यक्ष, लेखक, कवी, गायक, वक्ता, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रपाल सावंत आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या उपस्थितीत झाला.

अपरान्त अर्थात कोकणातील आंबेडकरी साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित आणि नवोदित साहित्यिकांसाठी अपरान्त साहित्य कला प्रबोधनी, रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून परिवर्तनशील क्रांतीच्या सांस्कृतिक चळवळीला वृद्धिंगत करण्याचे काम या प्रबोधिनीद्वारे सद्यःस्थिती जोमाने सुरू आहे. या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन नुकताच चिपळूण येथे संपन्न झाला. या निमित्ताने जाहीर कविता वाचनाच्या माध्यमातून महाकवी नामदेव ढसाळ यांच्या गाजलेल्या विद्रोही कवितांचे आणि काही कवींच्या स्वरचित कविता वाचनाने त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मानवंदना देण्यात आली. कवी संदेश सावंत, संजय गमरे, संदेश पवार,उत्तम पवार, मनीष जाधव आदी कवींनी तसेच कवी राष्ट्रपाल सावंत व शाहिद खेरटकर यांनी अतिशय सुंदर अशी भारदस्त स्वरात आपली काव्यरचना सादर केली.

यावेळी विद्रोही कवी संजय शांताराम कदम यांनी दलित पॅंथर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा विभागातील पहिल्या गाठीभेटीचा रोमांचक अनुभव कथन करताना म्हणाले, “इथल्या वंचित मूकनायकांच्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याना तेजोबळ देणारा आणि नवोदितांच्या लेखणीच्या माध्यमातून प्रक्षोभक विद्रोही साहित्याची परिभाषा प्रज्वलीत करणारा हा पहिला बंडखोर महाकवी इथल्या आंबेडकरी साहित्याला आजही दिशादर्शक ठरतो आहे; परंतु आम्हाला त्यांचा विद्रोह नीट समजावून घेता आला नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्याच्या वेळी त्यांच्याच प्रेरणेने त्यावेळी माझ्याही कवितेची दखल घेण्यात आली होती.

‘पहा, उजाडेल आता, श्वास रोखून ठेवा. मिटणाऱ्या पापण्यांना खिळे ठोकून ठेवा’ या कवितेच्या दोन ओळीनंतर पुढे संजय शांताराम कदम यांनी आपली स्वरचित कविता ‘व्हावा कवितेचा गाव माझा’ सादर केली. “म्हणे आजकाल कवितांची चर्चा, माझ्या भावकीत आहे. कदाचित, कालच्या विद्रोहाचा विषय, माझ्या गावकीत आहे… घ्या जरा सांभाळून, उद्याच्या या पाझरणाऱ्या लेखण्यांना, पहा आज त्या दिंडीतले ग्रंथ, माझ्या पालखीत आहे.”

दुसऱ्या सत्रात ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमांतर्गत चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचे सुप्रसिद्ध कवी संदेश सावंत यांच्या ‘क्रांती सूर्याच्या वाटेवर…’ या पुस्तकावर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, अपरान्तचे केंद्रीय सरचिटणीस आणि परिवर्तनवादी चळवळीच्या पुरस्कर्ता, लेखक, कवी, पत्रकार संदेश सावंत यांनी या पुस्तकावर व्यक्त होताना भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भांचा चिकित्सकपणे उहापोह करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रबोधिनीचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेची अश्वगतीने चाललेली वाटचाल आणि आगामी प्रबोधनात्मक लोकोपयोगी कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपली विद्रोही कविता सादर केली. या कार्यक्रमास प्रामुख्याने प्रा. नामदेव, डोंगरे, प्रा. डी. टी. कदम, प्रा. अनिल कांबळे, विलास सकपाळ, दिलीप मोहिते, मनोज पवार, मनीष जाधव, सौ. सावंत यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!