आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी, अंजणारी पुलांना मंजुरी
मंत्री उदय सामंत यांच्यामागणी नंतर तब्बल ८४.५७ कोटी मंजूर

रत्नागिरी : आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी आणि अंजणारी येथील महत्त्वाच्या पुलांच्या कामांना तब्बल ८४.५७ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या यशामागे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मोठे योगदान मानले जात आहे.
या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पुलांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्याच्या काळात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत होती. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास, शेतकऱ्यांना आपला माल बाजारात नेण्यास तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळवण्यासाठी गंभीर अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून मंत्री उदय सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आरवली, संगमेश्वर आणि सप्तलिंगी परिसरातील पूल हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. बावनदी आणि अंजणारी येथील पूल देखील स्थानिक संपर्कासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या सर्व प्रकल्पांना एकत्रित मंजुरी मिळाल्याने विकासाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे.
मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास हा माझा ध्यास असून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. या पुलांच्या कामामुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे. अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली”.
या प्रकल्पांमुळे भविष्यात या भागातील विकासाला नवी गती मिळणार असून, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसही मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एकूणच, ८४.५७ कोटींच्या या मंजुरीमुळे आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी आणि अंजनारी परिसरातील नागरिकांसाठी विकासाची नवी दारे खुली झाली आहेत.



