अलिबागच्या ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची युवा महोत्सवात बहारदार कामगिरी

अलिबाग (राजेश बाष्टे) : तरुणाईच्या उत्साहाने, कला-संवेदनांनी आणि स्पर्धेच्या जिद्दीने भारलेला मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ वा युवा महोत्सव नुकताच रायगड दक्षिण विभाग जिल्हास्तरीय फेरीसह मुरुड येथील अंजुमन ईस्लाम जंजिरा डिग्री विज्ञान महाविद्यालयात रंगला. रायगड विभागातील २२ महाविद्यालयांतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, मूर्तीकला, मेहेंदी अशा ३२ कलाप्रकारांत आपली कला सादर करत वातावरणात एक आगळा उत्सवभाव निर्माण केला.

या रंगतदार महोत्सवात ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथील १४ विद्यार्थ्यांनी १२ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेऊन बहारदार यश संपादन केले. असबा धानसे व अलिम शिरसेकर यांनी वादविवाद इंग्रजी माध्यम (प्रथम क्रमांक) पटकावला. असबा धानसे (कथाकथन इंग्रजी, द्वितीय क्रमांक), गायत्री म्हात्रे (कोलाज, द्वितीय क्रमांक), आर्या पाटील (वक्तृत्व, तृतीय क्रमांक), मनाली इंगळे (एकपात्री अभिनय, तृतीय क्रमांक), चैत्राली मराठे (मेहेंदी, उत्तेजनार्थ). या सर्व विजेत्यांनी आपल्या कलेच्या जोरावर मुंबई विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवासाठी पात्रता मिळवली, ही गोष्ट महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची ठरली आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड. नीलम हजारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या यशामागे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पियुषा पाटील आणि प्रा. चिन्मय राणे यांचे नेतृत्व, नॅक समन्वयक प्रा. नीलम म्हात्रे, प्रा. डॉ. संदीप घाडगे आणि प्रा. कौशिक बोडस यांनी बारकाईने दिलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. आर्य पाटील आणि विशाल पाटील यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पाहिले. या यशामुळे ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.



