रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी
मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईत आज काही ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १० जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरीत आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट, सातारा घाट, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट, सातारा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज ठिकाणी मसुळधार ते अतिमसुळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यंदा मे महिन्यावर पावसाने अधिक्रमण केले. अवकाळी पावसाने सूर्यदेवाला झाकळून टाकले. तर यंदा मान्सून सुद्धा सक्रिय झाला आहे. तो लवकरच येऊन धडकणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून धडकणार आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस धो धो बरसणार आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत पाऊस धो धो बरसणार आहे. अनेक भागांत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे.



