मुख्य बातमी

जिल्ह्यात मतदार यादीची ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम’ सुरू

१३.२९ लाख मतदारांच्या तपशिलाची होणार प्रत्यक्ष पडताळणी

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात मतदारयादीचा ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ अत्यंत वेगाने राबवला जात आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १३,२९,०४२ मतदारांच्या तपशिलाची अचूक खातरजमा करण्यासाठी जिल्ह्यातील १,७४७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत.

या पुनरीक्षण मोहिमेसाठी १ ऑक्टोबर ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून, या तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली जातील. आगामी ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर सर्व दावे व हरकती निकाली काढून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी यंदाच्या मोहिमेत सध्याच्या मतदार यादीतील तपशील सन २००२ च्या अंतिम मतदार यादीशी मॅप (Mapping) केला जाणार आहे. ज्या मतदारांचे नाव सन २००२ आणि सध्याच्या यादीतही उपलब्ध आहे, त्यांचे थेट मॅपिंग होईल. ज्यांचे नाव सध्याच्या यादीत आहे पण २००२ मध्ये नव्हते, अशा मतदारांच्या आई/वडील किंवा आजी/आजोबा यांचे नाव सन २००२ च्या यादीत तपासून मॅपिंग केले जाईल.

घरोघरी भेटीदरम्यान बीएलओ प्रत्येक मतदाराला २ गणना प्रपत्रे (Enumeration Forms) देतील. अचूकतेसाठी बीएलओ प्रत्येक घराला किमान ३ वेळा भेट देतील. मतदारांना ही गणना प्रपत्रे ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा ECINET या मोबाईल ॲपला भेट देऊन ‘Special Intensive Revision (SIR) – 2026’ अंतर्गत ‘Fill Enumeration Form’ वर क्लिक करावे.

गणना कालावधीत मतदाराचा सन २००२ मधील तपशील न आढळल्यास, त्यांचे नाव थेट प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही. अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले जाईल. सुनावणीच्या वेळी गणना प्रपत्राच्या मागील बाजूस दिलेल्या पुराव्यांपैकी एक वैध कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. खात्री पटल्यानंतरच नाव अंतिम यादीत समाविष्ट केले जाईल.

प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले ‘मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी’ (बीएलए) नियुक्त करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवीन पात्र मतदारांसाठी बीएलओकडे ‘Form-6’ आणि ‘Declaration Form’ उपलब्ध असेल. सर्व पात्र नागरिकांनी आपले गणना प्रपत्र वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!