डासांच्या नियंत्रणासाठी गप्पी मासे ही एक उत्तम जैविक पद्धत : दिलीप गुरव

रत्नागिरी : जिल्हा हिवताप अधिकारी संतोष यादव व आरोग्य पर्यवेक्षक एल. जी. पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह परिसरात गप्पी मासे सोडण्यात आले.
यावेळी आरोग्य सेवक मनिष साळवी, जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य निरीक्षक श्री. गुरव यांनी उपस्थितांना गप्पी मासे सोडण्याचा उद्देश समजावून सांगितला. ते म्हणाले, “साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती (पैदास) होत असते. अंडी, अळी, कोष, प्रौढ डास या संपूर्ण जीवन चक्राला साधारणपणे ७ ते ८ दिवस लागतात. एका वेळेला एक डास १५० ते २०० अंडी घालतो. एवढ्या झपाट्याने डासांची पैदास होत असते. यावर नियंत्रण आणण्यासाठी गप्पी मासे ही एक उत्तम जैविक पद्धत आहे.”
त्याच बरोबर आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे श्री. गुरव यांनी नमूद केले. कोरडा दिवस म्हणजे दर आठवड्याला एक दिवस ठरवून घेणे, त्या दिवशी आपल्या घरातील सर्व भांडी घासून पुसून कोरडी करून पुन्हा पाणी भरून मात्र व झाकून ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.



