जिल्हा पोलीस दलामार्फत ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन

रत्नागिरी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलामार्फत काढण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ अर्थात ‘एकता दौडला’ जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हिरवा झेंडा दाखविला. पोलीस परेड क्रीडांगणावरुन सुरु झालेल्या या एकता दौडची सांगता भाट्ये बीचवर झाली.

सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या एकता दौडला आज (३१ ऑक्टोबर) सकाळी येथील पोलीस परेड ग्राऊंडवरून जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक नीलेश माईणकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांनी उपस्थित सर्वांना शपथ दिली. ‘मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या ‘देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.’ अशी शपथ उपस्थित सर्वांनी घेतली. यानंतर जेल नाका, जयस्तंभ मार्गे ही दौड भाट्ये बीच येथे आली. याठिकाणी या दौडची सांगता झाली.



